आपल्या मुंबापुरी महानगरीत विविध समाजगट गुण्यागोविंदाने राहत आहेत. त्यांच्या काही समस्या आहेत. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांचा एक राजकीय कलदेखील आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर `नवशक्ति’ सादर करत आहे, मुंबईचं अस्सल सामाजिक राजकीय विश्लेषण, `मत’पंचायत’. आज मुंबईतल्या तेली समाजाचा आमचे प्रतिनिधी प्रकाश सावंत यांनी घेतलेला वेध.
तेली. तेलबियांपासून तेल काढणारे ते तेली. शेतीप्रधान व्यवसाय. या व्यावसायिकांचे तीळवण, कर्डिले, एक बैले, दोन बैले, घाची, राठोड, मोढ असे विविध उपघटक. सध्याच्या स्पर्धात्मक युगात तेली बांधव आर्थिक आघाडीवर कमी पडले आणि त्यांच्या हातातून तेल गाळण्याचा पारंपरिक व्यवसाय निसटला. त्यांनी मोठय़ा मेहनतीने काढलेल्या तेलापेक्षा कंपन्यांच्या तेलाकडे ग्राहकांचा ओढा वाढला. अमर उमर मिल, गीनी, जेमिनी, सनफ्लॉवर, गोदरेज, फॉर्च्यून यासारख्या बडय़ा तेल कंपन्यांनी अल्पावधीत आपले बस्तान बसविल्यानंतर मूळ तेली समाजबांधवांचा पारंपरिक व्यवसायच रसातळाला गेला. `तेलही गेले, तूपही गेले, हाती आले धुपाटणे’ अशी त्यांची अवस्था झालीय. अनेकांच्या नशिबी दारिद्रय़ाचे, दुर्दैवाचे दशावतार आलेत…
कोकणात तेली वाडय़ांमध्ये घाण्याला बैल जुंपून तीळ, करडई, शेंगदाणा यांचे तेल काढले जायचे. तेल काढल्यानंतर उरलेल्या चोथ्यापासून गुरांसाठी पेंड बनविली जायची. कालौघात तीळ, करडई, शेंगदाणा याचे उत्पादनच घटले. पर्यायाने घाणे बंद पडले. तेलीबंधूंची रोजीरोटी बुडाली. तेलाच्या घाण्यावर काम करणारे समाजबांधव अक्षरशः रस्त्यावर आले. अनेकांवर गावे सोडून रोजीरोटीसाठी शहराकडे धाव घेण्याची वेळ आलीय. शिक्षण कमी असल्याने दुय्यम दर्जाच्या नोकर्या करण्याची वेळ अनेकांवर आली. खेडेगावातील तेलीबांधव तर आजही आदिवासींचे जीवन जगत असल्याची खंत समाजबांधवांकडून व्यक्त केली जातेय.
`मुंबई महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजा’चे अध्यक्ष विलास त्रिंबककर, `तेली सेवा समाज मुंबई’चे अध्यक्ष भगवान सातर्डेकर, `कोकण स्नेही’ मासिकाचे संपादक सुरेश पडवळकर, `विश्वेश्वर सहकारी पतपेढी’चे अध्यक्ष दिलीप केळंबेकर, सामाजिक कार्यकर्ते मनोहर परुळेकर यांच्याशी `मत पंचायती’च्या माध्यमातून संवाद साधला असता, समाजाच्या विविध प्रश्नांची उकल होत गेली. तेली समाजाचा कल शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असला तरी समाजाला विविध राजकीय पक्षांकडून अपेक्षित प्रतिनिधित्व मिळत नसल्याची खंतही समाजबांधव व्यक्त करताहेत.
चार नगरसेवक!
तेलीबंधूंची मुंबईत दीड लाखांवर लोकसंख्या. कुणी ती 12 लाखाच्या आसपास असल्याचा दावा करतेय. लालबाग, परेल, लोअर परेल, दादर, शिवडी, जोगेश्वरी, बोरिवली, दहिसर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, मुंब्रा या भागात समाजबंधूंची मोठी वस्ती. नगरसेवकांमध्ये शशिकांत पाटकर (विलेपार्ले, पूर्व) भास्कर खुरसंगे (बोरिवली, पूर्व), रमाकांत रहाटे (चिंचपोकळी, पूर्व), रूपाली पावसकर (अंधेरी, पूर्व) यांचा समावेश आहे.
एकच मंत्री
सार्वजनिक बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी राज्यमंत्री विजय वडट्टीवार, चंद्रशेखर बावनकुळे, कृष्णा खोपडे, अनिल बावनकर हे आमदार म्हणून कार्यरत आहेत. माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनीही राजकारणात आपला ठसा उमटविलाय तर माजी आमदार रामदास तडस यांनी `तेली समाज जोडो’ अभियान मोठय़ा हिम्मतीने चालविलेय.
नाटय़-चित्रपट क्षेत्रात अशोक पावसकर, हनुमंत तेली, रमाकांत वागचौडे यांनी चमक दाखवलीय. प्रिंटिंग क्षेत्रात अरुण धोटे यांनी ठसा उमटविलाय. नऊ वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळविण्याचा पराक्रम फिल्म डिव्हिजनच्या अरुण गोंगार्डे यांनी गाजविलाय. उद्योगपती विक्रांत चांदवडकर यांचे नाव हवाई वाहतूक क्षेत्रात सर्वतोमुखी झालेय. ऑर्केस्ट्रा कलावंत म्हणून सुधीर खानिवलकर यांनी कर्तृत्व गाजविलेय.
मुंबईत तमाशाचा पहिला फड उभारून मधुकरराव नेवाळे यांनी एक आगळा इतिहास रचलाय. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सहकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून दर्शना नामदे यांनी वेगळी उंची गाठलीय. ऍड. अविनाश रसाळ हे वकिली व्यवसायाला जागले आहेत. वालावलकरांनी मसाला व्यवसाय `फेमस’ केलाय. आरोग्य सेवा क्षेत्रात डॉ. मोहिले यांनी सेवाधर्म जपलाय. नवी दिल्लीच्या ऐतिहासिक लोटस टेम्पलचे माजी अध्यक्ष डॉ. मंगेश तेली, श्याम शिंदे यांनी सामाजिक क्षेत्रात नाव कमाविलेय. विनायक कुवेसकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिलेय.
मुंबईत हवेय, बहुउद्देशीय तेली भवन!
इतर मागासवर्गीयांच्या 27 टक्के आरक्षणाचे तेली समाजाला पुरेसे फायदे मिळत नाहीत. त्यामुळे तेली समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींमध्ये आरक्षण द्या, क्रिमिलेअरची मर्यादा वाढवा, अशी मागणी केली जातेय. महाविद्यालयीन प्रवेश आणि सरकारी नोकर्यांत प्राधान्य द्यावे, यासाठी समाजाचा आग्रह आहे. यासंबंधीचा ठरावही समाजाच्या बैठकीत संमत झालाय. या मागणीसाठी नवी दिल्लीत येत्या एप्रिल महिन्यात समाजाच्या वतीने शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याचे सांगण्यात येतेय. पारंपरिक तेल उत्पादकांना सवलती द्यावी, तेलनिर्मिती करणार्या मशिनरीसाठी समाजबांधवांना सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या मागील पंधरा वर्षांपासून सातत्याने केल्या जात आहेत. तेली समाजबांधवांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी मुंबईत बहुउद्देशीय `तेली भवन’ उभारण्याचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी समाजबांधवांचे निकराचे प्रयत्न सुरू झालेत. त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती पाहून वाटतेय, `वाळुचे कण रगडिता तेलही गळे’